Thursday, April 2, 2020

संकटसमयी ‘अर्थक्रांती’ चे महत्व लक्षात येई ! 

ऐशा संकटसमयी ‘अर्थक्रांती’चे महत्व लक्षात येई ! 



कोरोनाच्या साथीमुळे आधुनिक जग एका अभूतपूर्व संकटाच्या अनुभवाला सामोरे जाते आहे. त्यामुळे त्या अनुभवाकडे कसे पाहावे, याविषयी समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थक्रांतीचे चार प्रस्ताव या स्थितीत आपल्याला दिशादर्शक ठरू शकतात, म्हणून हा संवाद... 



- यमाजी मालकर. ymalkar@gmail.com 



कोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. अशाच एका साथीत ४०० वर्षांपूर्वी युरोपने आपले दोन कोटी नागरिक गमावले होते, पण त्यावेळचे जग आणि आजचे जग याची कोणत्याच अर्थाने तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे या संकटावर माणूस मात करेल, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यासाठी वैयक्तिक पातळीवर शक्य ते केले पाहिजे. 


आधी आजची वस्तुस्थिती समजून घेऊयात. 
१. मानवजातीवर आलेले हे अभूतपूर्व संकट असल्याने ते किती गंभीर आहे, याचा अंदाज अजूनही जगाला येतो आहे. 
२. संकट सर्वव्यापी असल्याने त्याचा परिणाम जगातील ७८० कोटी माणसांवर या ना त्या मार्गाने होणार आहे. त्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. 
३. या संकटाने माणसाने निर्माण केलेले सर्व भेद गाडून टाकले असून केवळ अस्तित्वाच्या प्रश्नांची चर्चा करणे भाग पाडले आहे. 
४. नियतीने माणसावर नेहमीच विजय मिळविला आहे, तसेच यावेळीही झाले आहे. त्यामुळेच आजच्या अत्याधुनिक जगातील बुद्धीवान माणसाला तिने आज पुन्हा हतबल केले आहे. उद्याचा दिवस कसा असेल, हे आज आपण सांगू शकत नाही. 
५. गेल्या काही शतकात माणसाने घडवून आणलेल्या ‘विकासा’च्या जोरावर मानवजात आपल्या वर्तमान आणि भवितव्याविषयी इतकी निश्चिंत झाली होती की, आपले अस्तित्व १०० टक्के आपल्या हातात आहे, असे मानून तिने मानवी जगण्याचे प्राथमिक नियम नाकारण्यास सुरवात केली होती. आता मात्र आपले अस्तित्व सर्वाधिक महत्वाचे आहे आणि १०० टक्के परस्परावलंबी आहे, हे मानवाला पुन्हा मान्य करावे लागते आहे. 


मनातील अति चिंता दूर करण्यासाठी काय केले पाहिजे? 
१. आपल्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि देशांच्या भेदाबाबत आधी एक केवळ माणूस म्हणून या क्षणी निरपेक्ष व्हावे लागेल. 
२. सरकार नावाची व्यवस्था, त्यासाठी काम करणारे राजकीय नेते, पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्था – अशांची क्षमता या अचानक आलेल्या संकटात कमीच पडणार असल्याने ती त्रुटी भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो, एवढाच विचार केला पाहिजे. या व्यवस्थांवर टीका करण्याची ही वेळ नव्हे. सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या आवाहनांना साद दिली पाहिजे. 
३. अस्तित्वाच्या प्रश्नापुढे इतर सर्व प्रश्न गौण असल्याने अर्थव्यवस्थेचे काय होईल, रोजगाराचे काय होईल, अशा चिंता आताच करण्याचे कारण नाही. विशेषतः ज्यांच्याकडे अन्नपाण्याची तरतूद आहे, त्यांनी काहीकाळ तरी इतर चिंतांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. आतापर्यंत भौतिक श्रीमंतीचा फुगवटा तयार झाला होता, आता अस्तित्वाचे प्रश्न महत्वाचे ठरणार असल्याने अनेकांना तुलनात्मक गरीब व्हावे लागणार आहे, जे स्वीकारले पाहिजे.
४. अन्नपाण्याची तरतूद नसलेल्यांची केवळ चिंता करत बसण्यापेक्षा सरकार, काही कंपन्या आणि समाजसेवी संस्थानी पुढाकार घेतला आहे. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. (उदा. बँकेत थेट रक्कम जमा करणे आणि रेशनवर ८० कोटी नागरिकांना अधिक धान्य देणे) आणि तोच खरा आणि हक्काचा मार्ग आहे. 
५. छोटे उद्योग आणि नागरिकांचे कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, बिल भरणा हे याकाळात झेपणारे नाहीत, याची सरकारला जाणीव झाली असून त्यासंबंधी सवलतीचे निर्णय झाले आहेत आणि आणखीही होऊ शकतात. अर्थात, त्यामुळे सर्वांच्या सर्व समस्या दूर होण्याची  शक्यता नाही, पण ती आपल्या व्यवस्थेची मर्यादा म्हणून मान्य करावी लागणार आहे. 
६. अन्नपाण्याची गरज भागविण्याच्या पलीकडे मानवी जीवन कसे असावे, याविषयीच्या  आधुनिक माणसाच्या मनातील कल्पनांना गेले काही दशके जे प्रचंड धुमारे फुटले होते, त्याला याकाळात तरी स्वल्पविराम द्यावा लागेल. विशेषतः अर्थशास्त्राच्या भाषेत जगाचे मूल्यमापन करण्याऐवजी आता मानवी अस्तित्वाच्या भाषेत ते करावे लागेल. 
७. घरी राहा, सुरक्षित रहा, हा आजचा नारा आहे. पण त्यातून जे सर्वांना सहन करावे लागत आहे, त्याकडे जीव वाचविण्यासाठीची परीक्षा म्हणून पाहावे लागेल. म्हणजे घरातीलच काही जणांना वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकाचा त्याग करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला त्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आदर करण्याचे घरातीलच काहींना शिकावे लागेल. असे नवे धडे घेण्याची तयारी ठेवली तरच हा एक प्रकारे सक्तीचा सहवास आनंददायी होऊ शकतो. 


भविष्यात काय होईल, याच्या तीन शक्यता कोणत्या आहेत? 
१. चीनच्या हुआन शहरात जसे जीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येवू लागले आहे, तसे जगाचे जीवन पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरवात होईल. स्वाईन फ्ल्यू जसा अजूनही पूर्णपणे हद्दपार झाला नाही, तसे सुधारित औषधोपचाराच्या मदतीने माणूस कोरोनासोबत पुढे जगायला लागेल. (स्वाईन फ्ल्यूच्या वेळची सामसूम आठवून पहा) मात्र कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कायम राहील. वर्षभरात पुन्हा पूर्वीसारखे जनजीवन प्रस्थापित होईल. 
२. कोरोनाची साथ पुढील १५ दिवसांत आटोक्यात आली नाही तर जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल आणि त्याचे अतिशय विपरीत परिणाम होतील. विशेषतः १३६ कोटीच्या भारतात बेरोजगारीमुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे सरकारला न भूतो ना भविष्यती अशा उपाययोजना कराव्या लागतील. त्यात आहे त्या संधीचे न्याय्य वितरण आणि बेरोजगार तसेच वयस्करांना किमान समान उत्पन्नाची (युबीआय) तरतूद करावी लागेल. कोरोनाचा धोका कमी न झाल्याने पूर्वीचे खुले जग हा भूतकाळ होईल आणि आजच्यापेक्षा खूपच वेगळ्या जगात राहण्याची सवय आपल्या सर्वांना करून घ्यावी लागेल. (उदा. डिजिटल व्यवहार, ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन कार्यक्रम, शेतीचे महत्व वाढेल आणि ग्रामीण भागात राहणे माणसाला अधिक सुरक्षित वाटेल.) 
३. भारतात सध्या तरी ही साथ पसरण्याचा वेग तुलनेने कमी आहे. तो तसाच राहिला तर भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत लवकर पूर्वपदावर येईल, एवढेच नव्हे तर भारतीय जीवनशैलीचा अवलंब जगभर केला होईल आणि भारतीय वस्तूंना असलेली मागणी प्रचंड वाढेल. गुंतवणूक आणि उद्योग उभारणीसाठी चीनला एक पर्याय म्हणून भारताकडे जग पाहील. त्यातून भारत जगाचे ग्रोथइंजिन म्हणून मान्यता पावेल आणि भारताची पुन्हा घौडदौड सुरु होईल. 



अर्थक्रांतीचे प्रस्ताव दिशादर्शक का आहेत?
१. सर्व करांना सक्षम आणि सोपा सुटसुटीत पर्याय म्हणून बँक व्यवहार कर, हा एकच कर घेतला जावा, (आयात – निर्यात कर वगळून) अशी मांडणी अर्थक्रांती गेली २० वर्षे करते आहे. गेल्या २० वर्षांत बदललेले तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहारांत झालेली प्रचंड वाढ, भारतात वाढलेले बँकिंग आणि कोरोनाचे संकट.. यात बँक व्यवहार कर – हा आता अतिशय व्यवहार्य आणि आदर्श असा कर ठरू शकतो.  
२. अर्थक्रांतीच्या दुसऱ्या प्रस्तावानुसार सहा तासांच्या किमान दोन शिफ्टमध्ये देश चालला पाहिजे. संघटीत क्षेत्रातील रोजगारात कमीत कमी काळात मोठी वाढ करण्याचा याशिवाय दुसरा मार्ग नाही. संघटीत क्षेत्रातील रोजगार आज आहे एवढाच मर्यादित राहिला (आणि आता तर तो आणखी कमी होणार आहे.) तर भारतीय अर्थव्यवस्था चालूच शकणार नाही, कारण तेवढा सक्षम ग्राहकच बाजारात नसेल. काही प्रमाणात वेतनांत कपात केली तरी चालेल, पण बेरोजगारांच्या हाताला काम देणे, हे सर्वाधिक महत्वाचे आहे, जे केवळ रोजगार संधीचे न्याय्य वाटप करूनच शक्य आहे. 
३. अर्थक्रांतीच्या तिसरा प्रस्ताव असा आहे - ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता महिन्याला १० हजार रुपये मानधन देणे. कोरोनाच्या संकटापूर्वी असे मानधन देणे, कसे शक्य नाही, अशी चर्चा केली जात होती. पण आता तसे काही करण्याची अपरिहार्यता या संकटाने सिद्ध केली आहे. साठीपर्यंत या ना त्या भूमिकेत कुटुंब, समाज आणि देशासाठीच काम करणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून स्वीकारले पाहिजे आणि त्यांना केवळ द्याबुद्धीने नव्हे तर आपल्या देशातील एक चांगला ग्राहक म्हणून त्याला मान्यता दिली पाहिजे. आज संख्येने सुमारे १४ कोटीच्या घरात असलेले ज्येष्ठ नागरिक जर ग्राहक नसतील तर अर्थव्यवस्था, त्यांना टाळून कशी पुढे नेणार, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा प्रस्ताव होय. 


(प्रस्ताव येथे थोडक्यात मांडले असून अधिक चर्चेसाठी त्याच्या सर्व बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत. ती सर्व मांडणी अर्थक्रांतीने अर्थपूर्णमध्ये तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून यापूर्वी केलेली आहे.)


संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा

संभ्रम निर्माण करणाऱ्यांनो देशाची माफी मागा // यमाजी मालकर भारत नावाच्या आकाराने आणि लोकसंख्येने प्रचंड असलेल्या देशातील कोट्यवधी गरीबांना क...